अरे देवा! भविष्यात आणखी एक संकट, पुन्हा घरात व्हावं लागणार बंदिस्त
कोरोनाव्हायरसचा नाश होऊन आपण कधी घराबाहेर पडतो, याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. मात्र भविष्यात आणखी एक संकट उभं ठाकलंय.

नवी दिल्ली, 09 मे : कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) जगभरातील लोकांना घरात कैद व्हावं लागलं आहे. हा लॉकडाऊन (lockdown) संपून आपण कधी घराबाहेर पडतो असं प्रत्येकाला झालं आहे. मात्र काही वर्षांनी आणखी एक संकट येणार आहे, ज्यामुळे असंच पुन्हा घरात बंदिस्त व्हावं लागणार आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, 2060 साली आपल्याला पुन्हा घरात कैद व्हावं लागणार आणि याला कारण कोणता आजार नाही तर भीषण उष्णता (Extreme Heat) असणार आहे.
गेल्या काही दशकांत उष्णतेत वाढ होते आहे. सायन्स अॅडव्हान्स जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, 1979 पासून भारत, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, चीन, अमेरिकेत तापमानाचा पारा आणि आर्द्रता वाढण्याच्या अनेक घटना घटल्यात. आतापर्यंत ही समस्या केवळ एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित होती. मात्र ज्या पद्धतीनं हवामानात बदल होतं आहेत, त्यानुसार ही समस्या जास्त कालावधीसाठी वाढू शकते. 2060 सालापर्यंत ही समस्या सहा तासांपर्यंत वाढेल आणि इतर काही ठिकाणीही दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
सध्या जगभरात गरमी वाढते आहे आणि हा उकाडा असात वाढत राहिला तर भविष्यात जनजीवनावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती घराबाहेर पडणंही जीवघेणं ठरू शकतं.
या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि सध्या नासामध्ये काम करत असलेले कोलिन रेमंड यांनी सांगितलं की, "उष्णतेबाबत ही कमीत कमी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अशी शक्यता पहिल्यांदाच वर्तवली जाते आहे"
अमेरिकेच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने सांगितलं आहे की, "अशी परिस्थिती ओढावली तर ती आपल्यासाठी खूपच कठीण असेल. ओलसर आणि दमट हवामानात फक्त भीषण उकाड्यानंच लोकं हैराण होणार नाहीत तर हिट स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचाही सामना करावा लागेल"
तज्ज्ञांच्या मते, याचा लोकांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल. तसंच त्यावेळी अशा विशेष घरांची गरज पडेल जिथं लोकांना थंडावा मिळेल. तरंच या परिस्थितीचा सामना करणं शक्य होईल.
Comments
Post a Comment